सरकार...!
मी, एक पेन बोलतोय...! 🖌
माझ्या शरीरात ना बॅटरी आहे, ना चिप, ना कोणतं आधुनिक तंत्रज्ञान...माझ्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता नाही...पण माझ्या टोकावर लाखो विद्यार्थ्यांची खरी बुद्धिमत्ता उमलत असते. माझ्या शाईत अनेक घरांची स्वप्नं, आई-वडिलांचा त्याग आणि एका तरुणाच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं मोल मिसळलेलं असतं...मी हजारो स्पर्धा परीक्षांचा साक्षीदार आहे. कित्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इच्छा, सण-उत्सव, नाती, आनंद आणि तारुण्यही बाजूला ठेवलं, कारण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करायची होती. त्या प्रत्येक प्रवासात मी त्यांच्या सोबत होतो.
सरकार...
या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा विरोध नाही. देश आधुनिक व्हावा अशीच त्यांचीही इच्छा आहे. पण आधुनिकतेच्या प्रवासात एक गोष्ट हरवू नये. ती म्हणजे विद्यार्थ्यांची विश्वासार्हता. त्यांचा हा विश्वास कोणावर आहे ? तो कोणत्याही यंत्रावर नाही. तो कोणत्याही सॉफ्टवेअरवर नाही. तो आहे त्यांच्या स्वतःच्या बुद्धीमत्तेवर. दिवसभर अभ्यासिकेत घोरपडीसारखं चिकटून खुर्चीत बसून केलेल्या अभ्यासावर. प्रामाणिक परिश्रमावर. आणि त्या परिश्रमाला उत्तरपत्रिकेवर गोल करायला बळ देणाऱ्या माझ्यावर. एका साध्या पेनावर...
मी OMR उत्तरपत्रिकेवर फिरतो, तेव्हा मी फक्त एक गोल भरत नसतो तर त्या प्रत्येक गोलात विद्यार्थ्याच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येची नोंद होत असते. त्या शाईत त्यांच्या कपाळावरचा घाम असतो. आईने स्वतःच्या गरजा कमी करून विकत घेतलेल्या पुस्तकांचा सुगंध असतो. वडिलांनी भर उन्हात शेतामध्ये कष्ट करून गाळलेल्या घामाचं मोल असतं. त्या एका गोलात संपूर्ण कुटुंबाचं भविष्य दडलंलेलं असतं सरकार...
सरकार...
ऑफलाइन OMR परीक्षेचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे समान संधी. सर्व विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्नपत्रिका असते. त्यामुळे गुणांचं मोजमापही एकाच निकषावर होतं. नॉर्मलायझेशनसारख्या प्रक्रियेची गरज भासत नाही आणि गुणांमध्ये तांत्रिक हस्तक्षेप झाला असेल का, असा संशयही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत नाही. विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातो तो एका खात्रीने..."माझं यश किंवा अपयश हे केवळ माझ्या गुणवत्तेवर, माझ्या परिश्रमावर आणि मी OMR वर भरलेल्या उत्तरांवरच ठरणार आहे..." ही खात्रीच त्याला निःसंशयपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा हॉलमध्ये उभं राहण्याचं बळ देते. कारण विद्यार्थ्याला फक्त न्याय मिळणं महत्त्वाचं नसतं, त्याला न्याय झाल्याची निःसंशय जाणीव होणं त्याहूनही अधिक महत्त्वाचं असतं.
सरकार...
एक परीक्षा खूप काही असते हो...परीक्षा ही फक्त प्रश्न आणि उत्तरांचा व्यवहार नसते. ती वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासाची कसोटी असते, ती आई-वडिलांनी केलेल्या त्यागाला मिळणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा असते, ती लग्नाला आलेल्या तिशीतील तरुण मुलीच्या बापाच्या काळजाचा चुकलेला ठोका असते, एका उत्तरपत्रिकेवर केवळ गुण ठरत नाहीत, तिथे एखाद्या तरुण तरुणीचं भविष्य ठरतं. आणि त्या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं...व्यवस्थेवरचा विश्वास टिकणार की ढासळणार हे ठरत असतं. ती विश्वासाचा करार असते- विद्यार्थी आणि व्यवस्थेमधला. विद्यार्थी व्यवस्थेला एवढंच सांगतो की, "मी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे. आता माझ्या गुणवत्तेचं मूल्यमापनही तितक्याच प्रामाणिकपणे करा."
सरकार...
परीक्षापद्धती बदलताना केवळ तिची गती, किंवा तांत्रिक क्षमता पाहू नका. एकदा त्या विद्यार्थ्याच्या मनात डोकावून पहा. त्याच्याकडे संपत्ती नाही, सत्ता नाही, त्याच्याकडे आहे फक्त स्वतःची गुणवत्ता, आणि त्या गुणवत्तेचा प्रामाणिक साक्षीदार मी आहे. कारण मी कधीही कोणाचा पक्ष घेत नाही, मी श्रीमंतासाठी वेगळं लिहित नाही, गरीबासाठी वेगळं लिहित नाही. संगणक परीक्षा घेऊ शकतात, तंत्रज्ञान वेग देऊ शकतं. पण एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात "माझ्यासोबत न्याय झाला" हा विश्वास निर्माण करण्याची ताकद केवळ पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्थेतच असते.
सरकार...
मशीन जिंकणं फार मोठी गोष्ट नाही, पण विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणं हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीची, शासनाची सर्वात मोठी परीक्षा आहे. मी एक साधंसुधं पेन. आजही लाखो स्पर्धा परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला हातात घट्ट पकडतात. कारण त्यांना माहीत आहे, मी फक्त शाईने लिहित नाही. मी त्यांच्या परिश्रमाला न्याय मिळेल, या विश्वासाची सही करतो. माझ्या टोकातून OMR शीट वर उमटणारा प्रत्येक गोल ऑफलाइन परीक्षेवरच्या त्यांच्या निःसंशय विश्वासाची साक्ष असते.
म्हणून सरकार...मला जपायचं की नाही, हा प्रश्न नाही... विद्यार्थ्यांच्या मनात मी ज्या विश्वासाचं प्रतिनिधित्व करतो...तो विश्वास जपायचा की नाही, हा खरा प्रश्न आहे. कारण...मी संपलो तरी दुसरं पेन असेल. पण विद्यार्थ्यांच्या मनातला विश्वास संपला...तर माझ्या शाईलाही अर्थ उरणार नाही...
✍🏻-- अमोलप्रतिभा...